शोषित, उपेक्षितांना सत्ताधारी बनवण्यासाठी बसपाचे ‘चलो वाशीम’!

शोषित, उपेक्षितांना सत्ताधारी बनवण्यासाठी बसपाचे ‘चलो वाशीम’!

मुंबई, २६ एप्रिल :- महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसुर्य जोतिराव फुले यांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करीत राज्यात खऱ्या अर्थाने फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारावर चालणारे सरकार सत्तेवर आणून शेषित, उपेक्षित, पीडितांना सत्ताधारी बनवण्यासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने ‘चलो वाशीम’ची हाक देण्यात आली आहे. क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विशेष ‘जन्मोत्सवा’चे आयोजन २९ एप्रिल २०२२ रोजी दुपारी ४ वाजता वाशिम येथील नालंदा नगर परिसरातील महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर करण्यात आले आहे.

कोरोना महारोगराई दरम्यान बसपाचे सामाजिक जबाबदारीचे भान बाळगत कुठलेही जाहीर कार्यक्रम, जन्मोत्सव, सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले नव्हते. महारोगराईची स्थिती आता निवळल्याने ‘भीम जन्मोत्सवाचा’ कार्यक्रम भव्य स्वरुपात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील. सामाजिक परिवर्तनाचा संकल्प करून राज्यात निर्माण झालेल्या स्थितीत राजकीय परिवर्तनाचा एक सशक्त पर्याय सर्वसामान्यांना उपलब्ध करवून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बसपाचे प्रदेशाध्यक्ष ऍड. संदीप ताजने यांनी दिली आहे. सोहळ्यातून विविध क्षेत्रातील नामांकित मान्यवरांचा तसेच पक्षाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा बसपाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येईल. शिवाय महाराष्ट्रातील प्रख्यात प्रबोधनकार, राष्ट्रीय गायक राहुलजी अन्वीकर आणि त्यांच्या संचाकडून प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येणार असल्याचे ऍड. ताजने म्हणाले.

बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन. मायावती यांच्या मार्गदर्शनात, पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक, तरुण नेतृत्व आकाश आनंद यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महासचिव खासदार डॉ. अशोक सिद्धार्थ, प्रदेश प्रभारी नितीन सिंह, प्रदेश प्रभारी प्रमोद रैना यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. धार्मिक स्थळावरील भोंगे, हनुमान चालीसा पठण, राजकीय पक्षांकडून एकमेकांना वाहण्यात येणारी शिव्यांची लाखोळी राज्यातील रसातळाला गेलेल्या राजकीय परिस्थितीचे जिवंत उदाहरण आहे. या राजकारणाचा सर्वसामान्यांना काही एक फायदा नाही. पंरतु, सामाजिक परिवर्तनासाठी महापुरुषांनी दाखवलेल्या मार्गाचे पालन करीत “सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय” करीता, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, महागाई, बेरोजगारीसह इतर ज्वलंत मुद्द्यावर हात घालण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे ऍड. ताजने म्हणाले.

राज्यात इतर मागासवर्गीयांवरील ओबीसी राजकीय तसेच सामाजिक अत्याचार वाढ झाली आहे. अशात ओबीसी बांधव मोठ्याप्रमाणात बसपाकडे वळत आहेत. जिल्ह्यातील तसेच राज्यातील ओबीसी नेते देखील या कार्यक्रमात उपस्थित राहतील असे पक्षाच्या वतीने कळवण्यात आले आहे. प्रदेश प्रभारी सुनील डोंगरे, प्रदेश उपाध्यक्ष चेतन पवार, प्रदेश सचिव अविनाश वानखेडे तसेच वाशिम जिल्हाध्यक्ष बबनराव बनसोड यांच्यावतीने कोरोना काळानंतर पक्षातर्फे पहिल्यांदाच आयोजित या भव्य कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!