मतदारांनी सक्रिय सहभाग घेत मतदानाचा टक्का वाढवावा – मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम

मतदारांनी सक्रिय सहभाग घेत मतदानाचा टक्का वाढवावा – मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम

दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी यंत्रणा सज्ज

26 एप्रिल रोजी मतदान ; 16 हजार 589 मतदान केंद्र

मुंबई, 25 एप्रिल :- महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघामध्ये दि. 19 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये मतदारांनी चांगला सहभाग नोंदवत मतदान केले असून निर्भय आणि शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. दुसऱ्या टप्प्यातील 26 एप्रिल रोजी होत असलेल्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना चोक्कलिंगम म्हणाले, दुसऱ्या टप्प्यात विदर्भ व मराठवाड्यातील  बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या 8 लोकसभा मतदार संघामध्ये 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी एकूण 16,589 मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या निवडणुकीत 1 कोटी 49 लाख 25 हजार 912 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये इटीपीबीएसद्वारे 18,471 सेवा मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर 12 डी अर्जाद्वारे 85 वर्षावरील व  दिव्यांग असे एकूण 14,612 मतदार मतदान करणार आहेत. या आठ मतदार संघासाठी बॅलेट युनिट (बीयु) 37,403 तर कंट्रोल युनिट (सीयु) 16,589 आणि 16,589 व्हीव्हीपॅट उपलब्ध असून दुसऱ्या टप्प्यात एकूण 204 उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या निवडणुकीसाठी लागणारे साहित्य, साधनसामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारीवर्ग उपलब्ध आहेत. तसेच पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहे. या मनुष्यबळाचे रॅण्डमायझेशन (Randomization) करुन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. या निवडणूक प्रक्रियेसाठी यंत्रणा पूर्ण तयारीनिशी निवडणुकीसाठी सज्ज असून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, असे आवाहन चोक्कलिंगम यांनी यावेळी केले.

मतदान केंद्र सुरक्षेसह सज्ज

मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या ईव्हिएम व व्हिव्हिपॅट ची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही रॅण्डमायझेशन (Randomization) झाले आहे. या आठ लोकसभा मतदारसंघामध्ये ईव्हिएम व व्हिव्हिपॅट मशीन्सची विधानसभा मतदारसंघनिहाय कमिशनिंग (Commissioning) करण्यात येत आहे. संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये सीआरपीएफ (CRPF) च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

दुसऱ्या टप्प्यातील सर्व मतदारसंघासाठी मतदानाची सर्वसाधारण वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे.

मतदानाच्या 48 तास आधी प्रचारास बंदी

मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी आठही लोकसभा मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत.

मतदान करण्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन वोटर गाईड देण्यात आले आहे. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करुन दिल्या आहेत. इपीआयसी (EPIC) व्यतिरिक्त कोणते दस्तऐवज मतदानासाठी वापरता येतील याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देवून जनजागृती करण्यात आली आहे. आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी मतदान केंद्रे आवश्यक सोयी-सुविधांसह सुसज्ज आहेत.

ज्येष्ठ आणि दिव्यांगांसाठी सुविधा

85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या मतदान प्रक्रियेसाठी मतदारसंघनिहाय जनरल निरिक्षक आठ पोलीस निरिक्षक पाच तर खर्च निरिक्षक अकरा नियुक्त करण्यात आले आहे. 

प्रतिबंधात्मक कारवाई

कायदा व सुव्यवस्थांतर्गत 22 एप्रिलपर्यंत 49,134 शस्रास्रे जमा करण्यात आलेली आहे. तर परवाने रद्द करून 1057 शस्रे जप्त करण्यात आलेली आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी (CRPC) कायद्यांतर्गत 95,250 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

राज्यामध्ये दि. 1 मार्च ते 22 एप्रिल 2024 या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे 43.96 कोटी एकूण रोख रक्कम तर 34.78 कोटी रुपयांची दारु जप्त करण्यात आली. मौल्यवान धातू 88.37 कोटी रुपये, ड्रग्ज 216.47 कोटी, फ्रिबीज 0.47 कोटी आणि इतर बाब अंतर्गत 87.84 कोटी रुपये अशा एकूण 471.89 कोटी रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

26,265 तक्रारी निकाली

16 मार्च ते 23 एप्रिल 2024 या कालावधीत राज्यभरात सी व्हिजील ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या 3,345 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील 3,337 तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच याकालावधीत एनजीएसपी पोर्टलवरील 26,815 तक्रारीपैकी 26,265 निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

जाहिरात पूर्व प्रमाणिकरणाचे 122 प्रमाणपत्र वितरित

राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिध्दीकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे जाहिरातीच्या पूर्व प्रमाणीकरणासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने 122 प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहे.

error: Content is protected !!