लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-२०२४ विक्रमी मतदानासह निर्विघ्नपणे पडली पार

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-२०२४ विक्रमी मतदानासह निर्विघ्नपणे पडली पार

गडचिरोलीच्या जनतेने माओवाद्यांच्या बुलेटला मतदान करुन दिले चोख प्रतिउत्तर

गडचिरोली, २५ एप्रिल :- नुकताच १९ एप्रिल रोजी पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-२०२४ च्या पहिल्या टप्यात गडचिरोली पोलीस दलाने अतिशय उत्तम नियोजन व प्रभावी अंमलबजावणीच्या जोरावर पहिल्यांदाच निवडणुकांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडु दिला नाही. गडचिरोली पोलीस दलाचे हे ऐतिहासिक यश आहे. जिल्ह्यात विविध पोलीस दलातील सुरक्षा जवानांसह एकुण १५००० च्या वर जवानांचा फौजफाटा बंदोबस्तकामी तैनात करण्यात आला होता. गडचिरोली जिल्हा हा पूर्व विदर्भात एकुण ७१.८८ टक्केवारीसह मतदानात पहिल्या क्रमांकावर राहिला. सदर बाब ही नक्कीच अभिमानास्पद आहे. अतिदुर्गम भागातील आदिवासी जनतेने माओवाद्यांना न जुमानता लोकशाहीवर आपला विश्वास व्यक्त करत मोठ्या प्रमाणावर भरघोस मतदान केले. विशेष म्हणजे माओवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर बॅनर व पोस्टरबाजी करुन दुर्गम अतिदुर्गम भागातील जनतेला मतदान न करण्याचे आवाहन केले होते. यामध्ये अतिदुर्गम भामरागड तालुका पंचक्रोशीतील जनतेने माओवाद्यांनी लावलेले बॅनर व पोस्टर यांची होळी करत ५९.५४ टक्के मतदानाची नोंद करत माओवादाला जोरदार चपराक लगावली आहे. याच बरोबर गडचिरोली जिल्ह्यातील जनतेने अशाच प्रकारे माओवादाला न जुमानता आपला मतदानाचा हक्क बजावला. यामुळे त्यांच्या मनातील लोकशाहीला असलेला पाठींबा व माओवादाबद्दल असलेली चीड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

मतदानप्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गडचिरोली पोलीस दलातील सी-६० जवानांनी मोठ्या प्रमाणावर संपूर्ण जिल्हाभरात माओवादविरोधी अभियान राबविले. यासोबतच पोलीस स्टेशन कोठी येथील परिसरात माओवादी हे पोलीस जवानांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर बीजीएल चा मारा करुन पळून गेले. परंतू पोलीस जवानांनी त्याचा सतर्कपणे सामना करत कोणताही अनुचीत प्रकार घडू दिला नाही. सी ६० च्या जवानांनी लांब पल्याचे व आखुड पल्याचे प्रभावी अभियान राबविल्यामुळे निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडण्यास मदत मिळाली.

१९ एप्रिल रोजीची लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ ही शांततामय वातावरणत यशस्वीरित्या निर्विघ्नपणे पार पडावी या उद्देशाने निवडणुकीच्या पुर्वीच गडचिरोली जिल्ह्यालगत असलेल्या छत्तीसगड व तेलंगणा राज्यामधील जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ०५ आंतरराज्यीय बैठका घेण्यात आल्या होत्या. सदर बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील गोंदिया, चंद्रपूर व भंडारा, तेलंगणा राज्यातील कुमरामभिम, भुपालपल्ली व मंचेरीयल तसेच छत्तीसगड राज्यातील बीजापूर, नारायणपूर, कांकेर, मोहल्ला मानपूर व राजनांदगाव या जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून निवडणूकीसंदर्भाने महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे बैठकीत योग्य ती व्युहरचना आखल्याने लोकसभा निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यात मदत झाली.

लोकसभा निवडणुक २०१९ मध्ये पोस्टे गट्टा (जां.) हद्दीमधील वटेली, पुस्कोटी, गर्देवाडा व वांगेतुरी या भागात माओवाद्यांनी आयडी ब्लास्ट व गोळीबार करुन निवडणूक प्रक्रीयेत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. परंतू त्यावर मात करत गडचरोली पोलीस दलाकडून सदर भागात निवडणूक प्रक्रीया यशस्वीपणे पूर्ण केली. सदर बाब लक्षात घेत यावेळी गडचिरोली पोलीस दलाने नुकत्याच नव्याने उभारलेल्या वांगेतुरी, गर्देवाडा व पिपली बुर्गी या पोलीस स्टेशनमुळे सदर भागातील जनतेमध्ये माओवाद्यांप्रतीची असलेली भिती नाहीसी झाल्याने येथील नागरिकांनी मतदान करुन लोकशाहीच्या या उत्सवात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.

गडचिरोली पोलीस दलासह इतर सुरक्षा दलाचे एकुण १५००० जवानांनी मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांच्या नेतृत्वात कठोर मेहनत घेतली. भारतीय वायुसेनेचे ०३ एम.आय. १७ व २ ए.एल.एच आणि भारतीय लष्कराचे ०२ ए.एल.एच असे एकुण ०७ हेलीकॉप्टर व गडचिरोली पोलीस दलाच्या ०२ हेलीकॉप्टरसह एकुण ०९ हेलीकॉप्टरच्या सहाय्याने अतिसंवेदनशिल मतदान केंद्राच्या ठिकाणी पोलींग पार्टी रवाना करण्यात आल्या.

१३ एप्रिल ते १५ एप्रिल २०२४ असे तीन दिवस आरमोरी, अहेरी व गडचिरोली याठिकाणी गडचिरोली पोलीसांमार्फत एकुण ६१५ टपाली मतदान करण्यात आले. एकेकाळी माओवादी असलेल्या व लोकशाहीला न मानणाऱ्या १५८ आत्मसमर्पीत माओवाद्यांनी या लोकसभा निवडणुकीत भरघोस मतदानाची नोंद केली आहे.

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर आकाशमार्गाने सुक्ष्म पाहणी करण्यासाठी अत्याधूनिक १३० ड्रोनसह ड्रोन टीम तसेच माओवाद्यांच्या ड्रोनवर प्रतिहल्ला करण्यासाठी ०५ अँटी ड्रोन गन देखिल सज्ज करण्यात आले होते

एकुणच गडचिरोली पोलीस दलाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-२०२४ या नियोजनबद्धपणे पार पाडतांना गेली दोन ते तीन वर्षापासुन दुर्गम अतिदुर्गम भागातील जनतेकरीता जनजागरण मेळावे, आरोग्य मेळावे, कृषी मेळावे, महिला मेळावे, ग्रामभेटी, शांतता रॅली, गडचिरोली महोत्सव, गडचिरोली महामॅरेथॉन स्पर्धा, इ. माध्यमातुन नाविण्यपुर्ण योजना राबविल्या. दुर्गम व अतिदुर्गम भागातील जनतेसह शहरी भागातील जनतेच्या मनामध्ये गडचिरोली पोलीस दलाच्या प्रती विश्वास निर्माण होण्यास मदत मिळाली. त्याच बरोबर गडचिरोली पोलीस दलाने देखील निवडणुकीच्या काळात कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घेतली. येथील जनतेने माओवाद्यांनी मतदान न करण्याच्या आवाहनाला न जुमानता भरघोस मतदान केले. यातुन माओवाद्यांना दुर्गम भागातील जनता पुर्णपणे विरोध करत असल्याचे तसेच भारतीय संविधान व लोकशाहीवर त्यांचा दृढ विश्वास असल्याचे दिसुन येते.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सर्व गडचिरोलीतील नागरिकांचे याबद्दल अभिनंदन केले आहे. लोकसभा निवडणुक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी मेहनत घेतलेल्या अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन), कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी, एम. रमेश, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी, सर्व दुय्यम अधिकारी व अंमलदार, सी-६० चे जवान तसेच विविध ठिकाणाहून आलेल्या सर्व पोलीस अधिकारी/अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे. त्याच बरोबर पोलींग पार्टी यांच्या उत्तम अशा सहकार्यामुळे निवडणुक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मदत मिळाल्याचे सांगत त्यांचे देखील पोलीस अधीक्षकांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!