नवरगाव येथे विवाह सोहळा होणार दारूमुक्त

नवरगाव येथे विवाह सोहळा होणार दारूमुक्त

भरीटोला व नवरगाव वासियांचा निर्णय

कोरची, 04 मे :- तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या आदिवासीबहुल भरीटोला येथील वधू व नवरगाव येथील वर पक्षाचा विवाह सोहळा नवरगाव येथे होणार आहे. हा विवाह सोहळा दारूमुक्त करण्यासाठी दोन्ही गावांनी निर्णय घेतला आहे. यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेने बैठक घेऊन लोकांना जागृत केले. विशेष म्हणजे, कोरची तालुक्यातील जवळपास २० आदिवासी गावांमध्ये हा उपक्रम सुरु आहे.

भरीटोला येथे मुक्तिपथ व गाव संघटनेच्या माध्यमातून मागील सात वर्षांपासून अवैध दारूविक्री बंदी आहे. तसेच पाच वर्षांपासून लग्न व इतर कार्यक्रम सुद्धा दारूमुक्त साजरे केले जात आहेत. गावात कोणी दारु पिउन गावात फिरले तरी दंड घेतल्या जातो. नुकतेच लक्ष्मण मडावी गाव संघटना अध्यक्ष  यांच्या मोठ्या मुलीचे लग्न नवरगांव येथे आहे. त्यामुळे भरीटोला व नवरगांव येथे दारुमुक्त लग्नाची बैठक घेतली. गोंड समाजात दारुमुक्त लग्न करण्याचे ठरविले. समाजात कोणी  हळदीच्या दिवसापासुन तिन दिवस दारुचे सेवन करणार नाही, सेवन केल्यास नगदी पाचशे रुपयाचा दंड घेण्याचे ठरविले. कुटुंबाची  व गावाची बदनामी  होऊ नये, यासाठी समाजाचा निर्णय गायता पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

यावेळी भरीटोला येथील सुकराम होळी पोलीस पाटील, लक्ष्मण मडावी गाव संघटना तथा पेसा अध्यक्ष, सुरेश मुंगनकर सचिव गावातील समस्थ नागरीक उपस्थित होते तसेच नवरगाव येथे बलसराम कल्लों पालीस पाटील, सोमजी घावडे गाव संघटना अध्यक्ष, तुलशीराम काटेंगे, राम काटेंगे, निजमसाय घावडे, रामजी घावडे, मडावी व ग्रामस्थ होते. यासाठी मुक्तिपथ तालुका संघटिका निळा किन्नाके यांनी मार्गदर्शन केले.

कोरची तालुक्यातील जवळपास २० आदिवासी गावांमध्ये होणारे विवाह सोहळे दारूमुक्त होत आहेत. यासाठी पेसा कायदा अंतर्गत ग्रामसभेच्या माध्यमातून निर्णय घेतल्या जात आहे. ज्या गावांमध्ये विवाह सोहळा पार पडणार आहे, तिथे बैठक घेऊन संबंधित कुटुंबाना दारूमुक्त लग्नाचे महत्व पटवून दिले जात आहेत. या निर्णयामुळे शांततेत लग्न सोहळे पार पडत असून व्यसनाचे प्रमाण देखील कमी होत आहेत. इतर गावांनी / समाजाने अशा दारूमुक्त लग्न सोहळा या पद्धतीचा आदर्श घेतला पाहिजे व इतरत्र प्रचार प्रसार केला पाहिजे.

error: Content is protected !!